संभाजी ब्रिगेड

माहितीपत्रक

व्याख्या व ओळख

संभाजी ब्रिगेड (Sambahji Brigade) या नावातील “संभाजी” हे स्वराज्याचे द्वितीय छत्रपती, शिवपुत्र संभाजी महाराजांचे नाव असून ब्रिगेड या इंग्रजी शब्दाचा अर्थ  “विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून काम करणाऱ्या शिस्तबद्ध व समर्पित लोकांचा समूह” असा आहे. थोडक्यात संभाजी ब्रिगेड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना आपले आदर्श मानून समाजातील एकत्र आलेल्या वैचारिक व समर्पित युवकांची शिस्तबद्ध संघटना असा अर्थ संघटनेच्या नावातून प्रतीत होतो. प्रविणदादा गायकवाड हे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असुन महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात तसेच महाराष्ट्र आणि भारताबाहेरही संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यरत आहेत. प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या संभाजी ब्रिगेडची विचारधारा मानणारा आणि त्या विचारधारेचा पुरस्कार करणारा एक मोठा हितचिंतक आणि समर्थक वर्ग समाजात आहे.

संभाजी ब्रिगेड समजून घेताना...

संभाजी ब्रिगेड समजून घेण्यासाठी संघटनेच्या विविध विषयांमधील भूमिका काय आहेत, हे आपणास माहीत असायला हवे. त्या भूमिका पुढीलप्रमाणे :

१) सामाजिक : संभाजी ब्रिगेड ही मराठा समाजाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील प्रश्नांवर अभ्यासू आणि आक्रमक पद्धतीने काम करणारी सामाजिक संघटना आहे. ती पुरोगामी, विज्ञानवादी आणि प्रागतिक विचारसरणीचे समर्थन करते. मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करत असतानाच समाजातील सर्व जातीधर्माच्या घटकांसोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित करुन आपापसांतील दरी कमी करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने नेहमी पुढाकार घेतला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने समाजासाठी आपल्याकडील वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य व पैसा यापैकी जे शक्य असेल ते योगदान देऊन आपले सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत राहावे, हा संभाजी ब्रिगेडचा विचार आहे.

२) इतिहास : इतिहास हे जसे शास्त्र असते, तसेच ते शस्त्रही असते. इतिहासाच्या शास्त्रामध्ये खोट्या गोष्टी घुसडून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी त्याचा शस्त्रासारखा वापर करणाऱ्या प्रवृत्तींना संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. आपल्या इतिहासाचे अस्सल संदर्भ साधनांच्या साहाय्याने वस्तुनिष्ठ पद्धतीने पुनर्लेखन व्हावे आणि नव्या पिढीच्या हातात खरा इतिहास जावा, यासाठी संभाजी ब्रिगेडने सातत्याने आग्रही भूमिका घेतली आहे. इतिहासलेखनाच्या क्षेत्रात विकृतीकरण करणाऱ्या लोकांना प्रसंगी आक्रमकपणे धडा शिकवणारी संघटना, अशी संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. समाजापर्यंत खरा इतिहास पोहोचवण्यासाठी लेखक, वक्ते, शाहीर, कवी, साहित्यिक, कलाकार घडवण्याचे आणि त्यांना पाठबळ देण्याचे काम संभाजी ब्रिगेड नेहमी करत आली आहे.

३) आर्थिक : १९९१ साली देशाने खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) धोरण स्वीकारल्यानंतर आर्थिक विश्वात फार मोठे बदल झाले. या बदललेल्या जगाची पावले ओळखून संभाजी ब्रिगेडने समाजात आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ सुरु केली आहे. छत्रपती शिवरायांच्या “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला” या संकल्पनेवर निष्ठा ठेवून संभाजी ब्रिगेडने “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” ही नवीन संकल्पना मांडली आहे. “नवी दिशा नवा विचार” हे ब्रीद घेऊन संभाजी ब्रिगेडने समाजाला आरक्षणाच्या “अ” कडून अर्थकारणाच्या “अ” कडे घेऊन जाण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी संघटनेच्या वतीने राज्यभर बिझनेस कॉन्फरन्स, उद्योजक मेळावे, रोजगार मेळावे घेऊन युवक-युवतींना देश-परदेशात उपलब्ध असणाऱ्या उद्योग, व्यवसाय, रोजगार व शिक्षणाच्या संधीविषयी माहिती व मोफत मार्गदर्शन दिले जाते. मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी, हे संभाजी ब्रिगेडचे ध्येय आहे.

४) धार्मिक : संभाजी ब्रिगेड भारतीय राज्यघटनेला सर्वोच्च मानते आणि राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या स्वातंत्र्याचा आदर करते. आपल्या देशात प्रत्येक नागरिकाला धार्मिक उपासनेचा, आपापले धर्मस्वातंत्र्य जपण्याचा तसेच धार्मिक बाबींवर आपले मत मांडण्याचाही अधिकार आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना विज्ञानवादी विचारांवर अधिष्ठान ठेवते. संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेचा संघटनेवर प्रभाव आहे. धर्मातील चांगल्या बाबी जरुर स्वीकाराव्यात, मात्र त्या स्वीकारत असताना त्यावर चढलेली चमत्कार, कर्मकांड, कालबाह्य परंपरा, अनिष्ट रुढी, अंधश्रद्धा, चुकीच्या व अमानवी प्रथा इत्यादिंची पुटे बाजूला सारायला हवीत अशी संघटनेची भूमिका आहे.

५) राजकीय : संभाजी ब्रिगेड ही बिगरराजकीय सामाजिक संघटना असून ती लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवते. शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा मानणाऱ्या आणि या विचारधारेला पाठबळ देणाऱ्या राजकीय घटकांना सहकार्य करण्याची भूमिका संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी घेतली आहे. संघटनेच्या केंद्रीय बैठकीत कार्यकारी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जातात आणि त्यानंतरच लोकशाही पद्धतीने बहुमत घेऊन राज्यस्तरावरील कुठलीही राजकीय भूमिका निश्चित केली जाते. स्थानिक पातळीवर संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आणि कार्यकर्त्याला व्यक्तिगत स्वरूपाचे राजकीय निर्णय घेण्याचेही स्वातंत्र्य दिले जाते. तथापि संभाजी ब्रिगेड ही संघटना कुठल्याही विशिष्ट पक्षाशी बांधील नाही हे संघटनेने अनेक प्रकरणांमध्ये आक्रमक व विरोधाची भूमिका घेऊन दाखवून दिले आहे.

संभाजी ब्रिगेडची Seeing Is Believing (सीइंग इज बिलिविंग) संकल्पना

कोणतीही गोष्ट स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय, स्वतः अनुभवल्याशिवाय लोकांना विश्वास बसत नाही. हेच वास्तव लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेडने Seeing Is Believing या संकल्पनेतून शेकडो युवक-युवतींना प्रत्यक्ष दुबई अभ्यासदौरा, सिंगापूर अभ्यासदौरा, सह्याद्री फार्म्स अभ्यासदौरा, घडवून त्यांच्या दृष्टिकोनात बदल करण्याचे काम केले आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून समाजाची निराशावादी मानसिकता बदलणे, त्यांच्यातील न्यूनगंड दूर करणे, त्यांच्यात “आपणही करु शकतो” ही जिद्द आणि विश्वास निर्माण करणे हा संभाजी ब्रिगेडचा हेतु आहे.

संभाजी ब्रिगेड काय काम करते?

१) उद्योग/व्यवसाय/रोजगार : तरुणांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे संभाजी ब्रिगेडचे प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी समाजातील सुशिक्षित व कौशल्यप्राप्त गरजू युवक-युवतींना सर्व प्रकारच्या उद्योग-व्यवसायासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे, तसेच देश-परदेशातील रोजगाराच्या विविध संधींची माहिती करुन देण्याचे काम संभाजी ब्रिगेड करते. संभाजी ब्रिगेडतर्फे “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” या फेसबुक/व्हॉटस्अॅप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाते. तसेच दरमहा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बिझनेस कॉन्फरन्सचे आयोजन करुन तरुणांना नवनवीन उद्योग व्यवसायांची माहिती, भांडवल उभा करण्यासाठी बँकांकडून व शासकीय योजनांच्या माध्यमातून होणारा पतपुरवठा तसेच बाजारपेठांमधील सद्यस्थिती अशा विविध कळीच्या मुद्द्यांवर अभ्यासू जाणकारांची मनोगते आयोजित करून मार्गदर्शन केले जाते. याच विचारांनी संभाजी ब्रिगेडमधील प्रत्येक युवक-युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे.

२) शिक्षण : शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापासून ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीला लागेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा समस्या सोडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असते. शिक्षणाचे बाजारीकरण, शाळा-कॉलेजांमधील भरमसाठ फी, खाजगी क्लासेसवाल्यांकडून होणारे आर्थिक शोषण, रॅगिंगसारखे गैरप्रकार, शिक्षणासाठी आवश्यक शासकीय दाखले मिळवताना येणाऱ्या अडचणी, अभ्यासक्रमातील चुका, शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, परीक्षा व निकालांमध्ये होणारी दिरंगाई, रोजगाराचे प्रश्न, इ. अनेक प्रकारचे विषय संभाजी ब्रिगेडकडूंन यशस्वीरीत्या हाताळले जातात. सरकारने शिक्षणावरील बजेट वाढवावे, सरकारी व खाजगी शिक्षणातील फीमध्ये समानता आणून महागाई कमी करावी, यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने संघर्ष करत आहे.

३) नोकरदार : अनेक नोकरदार समाजबांधवांना परप्रांतीय किंवा स्थानिक कंपन्यांकडून कामाच्या ठिकाणी/ऑफिसमध्ये पिळवणूक, फसवणूक किंवा मानसिक छळ करुन त्रास दिला जातो. त्यांचे वेतन/मोबदला रखडवला जातो. अशा ठिकाणी संभाजी ब्रिगेडने सामाजिक दबावगट म्हणून आंदोलन, उपोषण, समज देणे, इ. वेगवेगळ्या माध्यमातून समाजबांधवांचे प्रश्न मार्गी लावून होणाऱ्या त्रासातून त्यांची मुक्तता केली जाते.

४) आरोग्य : सर्वसामान्य नागरिकांचे दवाखान्यांमधून होणारे आर्थिक शोषण, आरोग्यविषयक सुविधांबद्दल असणारा माहितीचा अभाव, रात्री-अपरात्री अचानकपणे लागणारी कोणत्याही प्रकारची तातडीची मदत, अपघात, यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अहोरात्र गरजूंची मदत करण्यासाठी तत्पर असतात. गोरगरिबांना शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडकडून जनजागृती केली जाते.

५) आपत्ती व्यवस्थापन : आपल्या आजूबाजूला कुठेही महापूर, भूकंप, भुस्खलन, अपघात, पडझड, ट्रॅफिक, इ. यांसारखी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली, तर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे संबंधित ठिकाणी जाऊन मदत आणि बचावकार्य करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडत असतात. या कामांसाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव असणाऱ्या तरुणांच्या “रेस्क्यू टीम” तयार करण्यात आल्या आहेत. संभाजी ब्रिगेडने “फ्लड रिलीफ फंड”च्या माध्यमातून राज्यातील महापुराच्या प्रसंगी वेळोवेळी पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तु व आर्थिक स्वरूपाची मदत पोहोचवली आहे.

६) क्रिडा : महाराष्ट्राच्या ग्रामीण-शहरी भागातील गरीब आणि गरजू कुटुंबातील उदयोन्मुख खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षणाची सोय, विविध ठिकाणच्या स्पर्धांच्या वेळी त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करणे, सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभे करणे, कार्यक्रम घेऊन त्यांचा यथोचित सन्मान करत त्यांना प्रोत्साहन देणे, इ. बाबतीत संभाजी ब्रिगेड नेहमी पुढाकार घेत आली आहे.

७) गडकिल्ले : गडकिल्ले म्हणजे आपल्या इतिहासाचा वारसा आहेत. या वारशाचे जतन व संवर्धनाचे काम करताना हेच काम करणाऱ्या इतर संस्थांनाही संभाजी ब्रिगेडचे नेहमी सहकार्य असते. गडकिल्ल्यांवर होणारी गैरकृत्ये व अनधिकृत बाबी रोखणे, मद्यपान व अश्लील चाळे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे, गडकिल्ल्यांच्या प्रश्नांसंदर्भात शासनावर दबाव निर्माण करणे, मुलांमध्ये लहानपणापासूनच गडकिल्यांविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी गडकोट भ्रमंती मोहिमांचे आयोजन करणे, इत्यादि विविध प्रकारचे उपक्रम संभाजी ब्रिगेडकडून राबविले जातात.

८) सांस्कृतिक : संभाजी ब्रिगेड प्रबोधन चळवळीच्या माध्यमातून तरुणांना वैचारिक दिशा देण्याचे काम करते. समाजात वाचनाची चळवळ निर्माण करुन तरुणांचे मन-मेंदू-मस्तक-मनगट-मणका सशक्त करण्याचे कामही संघटना करत असते. संभाजी ब्रिगेडने स्वतंत्र बुद्धीने विचार आणि लिखाण करणाऱ्या, मत मांडणाऱ्या वैचारिक तरुणांची पिढी निर्माण केली आहे. साहित्य, संस्कृती, चित्रपट, नाट्य, संगीत, कला, इत्यादि विविध माध्यमातून होणारी इतिहासाची मोडतोड आणि चुकीच्या इतिहासाचा प्रसार रोखण्यासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे लढा दिला आहे. संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील धार्मिक व जातीय दंगली कमी झाल्या आहेत. सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवाद नष्ट करून सामाजिक सलोखा वाढीस लागण्यासाठी संभाजी ब्रिगेड सदैव कटिबद्ध असते.

मागच्या २५ वर्षांतील संभाजी ब्रिगेडची काही प्रमुख कामे

  • २००३-०४ साली अमेरिकन लेखक जेम्स लेनच्या बदनामीकारक पुस्तकावर कायदेशीर बंदी आणली.
  • २००५ साली जेम्स लेनला लिखाणासाठी मदत करणाऱ्या भांडारकर संस्थेवर कारवाई करून बदनामीचा कट रचणाऱ्या लोकांना उघडे पाडले.
  • २०१० साली पुराव्यांच्या आधारे कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसल्याचे सिद्ध करून कायदेशीर मार्गाने लालमहालातील कोंडदेव शिल्प हटवले.
  • २०१२ साली रायगडवरील शिवसमाधी शेजारील अनैतिहासिक व काल्पनिक वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला.
  • २०१५ साली शिवचरित्राची मोडतोड आणि मराठा कुणबी स्त्रियांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यास विरोध केला.
  • २०१६ सालच्या मराठा क्रांती मोर्चाचे अनेक जिल्ह्यांमध्ये यशस्वी आयोजन व संयोजन करण्यात पुढाकार घेऊन त्यात सिंहाचा वाटा उचलला.
  • २०१७ साली छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या राम गणेश गडकरींचा पुतळा पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातून हटवला.
  • २०२० साली बिडीच्या बंडलाला देण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराजांचे नाव आणि फोटो हटवण्याचे ऐतिहासिक काम केले.
  • २०२१ साली मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू समजून घेऊन समाजाला आर्थिक निकषावरील EWS आरक्षणाची बाजू पटवून दिली.
  • २०२२ सालापासून “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुख आपला” संकल्पनेच्या माध्यमातून समाजातील हजारो तरुणांना आखाती देश, पोलंड, रोमानिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, आफ्रिका इत्यादि विविध देशांमध्ये चांगल्या नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या.

पुढील २५ वर्षांसाठी संभाजी ब्रिगेडची दिशा

गेली ४०-४२ वर्षे मराठा समाजाचा वेळ, पैसा आणि ताकत आरक्षण या एकाच विषयाभोवती केंद्रित झाली आहे. सरकारी धोरणांमुळे शेती आणि रोजगाराचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने मराठा समाजासमोर आपल्या भवितव्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आजच्या काळात अर्थाशिवाय कशालाच अर्थ नाही, त्यामुळे किमान मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी तरी प्रत्येकाकडे पैसा असायला हवा. वर्तमानात तुमची संख्या किती आहे, यापेक्षा अर्थकारणावर तुमची पकड किती आहे याला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडची पुढील वाटचाल ही “मराठा कम्युनिटी ही बिझनेस कम्युनिटी व्हावी” या दिशेने राहणार आहे. त्यासाठी संभाजी ब्रिगेडने ‘मराठा’ शब्दाची नवीन व्याख्या केली आहे.

M A R A T H A
M - Money (पैसा)
A - Aspiration (प्रेरणा)
R - Resources (साधने)
A - Ambitions (इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा)
T - Talent (ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य)
H - Humbleness (नम्रता)
A - Achievement (यश).

थोडक्यात जो व्यक्ती पैसा कमावण्यासाठी त्याच्याकडे असणारी प्रेरणा, साधने, इच्छाशक्ती, ज्ञान आणि नम्रता यांचा योग्य वापर करुन यशस्वी होतो, तोच आजच्या काळातील मराठा ! आजच्या युगात “डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी” म्हणजेच डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि खिशात पैसा असेल तरच तुमचा निभाव लागणार आहे. तर चला मग, संभाजी ब्रिगेडच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या चळवळीत सामील होऊया. मी मराठा – मी उद्योजक हा विचार सार्थ ठरवूया ! चला जग जिंकूया !

जय जिजाऊ जय शिवराय!

Scroll to Top